Categories
उपक्रम

पाण्याचे महत्त्व जाणून निर्माल्य परसबागेत विसर्जन करण्याचा गडचिरोलीकरांचा उपक्रम संपन्न

ऑक्टोबर - २०१८

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोलीच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून मूर्तींच्या स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंत जनजागरण केले जाते. यावर्षी सुद्धा पोलिस विभाग, मूर्तिकार बांधव, कुंभार समाज बांधव, शालेय विद्यार्थी, गणेश मंडळाचे पदाधिकारी व पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते, यांना सोबत घेऊन शहरातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून महा. अंनिसचे सक्रिय कार्यकर्तेप्रा. देवानंद कामडी यांच्या घरी बसविण्यात येणार्‍या गणेश मूर्तीचे विसर्जन ते घरीच करतात व निर्माल्य परसबागेत पुरून त्याचे उत्तम सेंद्रिय खत म्हणून झाडांसाठी उपयोगी आणतात. या कार्यासाठी घरच्यांचे देखील त्यांना सहकार्य मिळत असते. याही वर्षी त्यांनी र्गीेश मूर्तीचे विसर्जन घरीच करून परंपरा कायम राखली व उपस्थित विद्यार्थ्यांनी मूर्तींचे विसर्जन तलावातील अगर नदीतील पाण्यात न करता आई-वडिलांना सांगून घरच्या घरीच करा, असे आवाहन केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा गडचिरोली व राणी दुर्गावती कन्या विद्यालय तथा कन्या कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवादरम्यान विविध पर्यावरणपूरक उपक्रम नियोजनपूर्वक राबविले जात असून याचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन गणपतीपूजेसाठी वापरण्यात आलेले निर्माल्य नदीपात्रात अथवा तलावातील पाण्यात विसर्जित न करता ते गोळा करून भाविकांच्या मदतीने त्यांच्याच परसबागेत पुरून त्यापासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार करण्याचे काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून नुकतेच रेव्हेन्यू कॉलनी येथील अंनिसचे कार्यकर्ते प्रा. विलास पारखी, राजेश चुर्‍हे , पुरुषोत्तम ठाकरे यांच्या घरी स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयाच्या हरितसेना विभाग व गाईड्स व महा. अंनिसतर्फे निर्माल्य गोळा करून परसबागेत पुरण्यात आले.